©डॉ. #सचिनकेतकर
"मानसिक आपत्तीत असणाऱ्या लोकांना 'उगाच काळजी करतोयस/ उगाच रडतोयस/मन स्ट्रॉंग बनव 'असले सल्ले देऊ नयेत" हि पोस्ट थोडी उलगडून सांगतो.
मानसिक तणाव, खचलेली मनोवृत्ती( डिप्रेशन) अशा समस्यांमध्ये सल्ले देणारे उत्साही हितचिंतक भरपूर असतात.साहजिक आहे. अर्जुनाला सल्ला देणाऱ्या भगवान श्रीकृष्णाचा रोल करण्याची संधी क्वचित मिळते ती कोण सोडेल!! पण अशा सल्लेकर्यात खर्या तळमळीने सल्ले देणारे आधीच कमी असतात. जे थोडेफार असतात ते सल्ले देतात ते नेमके चुकीच्या पद्धतीने. म्हणजे त्यांचा उद्देश धीर द्यायचा असतो पण परिणाम नेमका उलट होतो. कसे ते बघू.
©डॉ. #सचिनकेतकर
उदा. #उगाच काळजी करतोयस मधला 'उगाच' हा एकच शब्द सोलिड खतरनाक आहे. या एका शब्दानेच तुम्ही त्याच्या वेदना समजू शकणार नाही, हा सिग्नल त्याला मिळतो. उगाचच यात 'मुद्दाम, किरकोळ, बिनकामाचा' अशा अनेक अर्थछटा आहेत. रुग्ण त्याच्या आजाराप्रमाणे यातला अर्थ उचलतो. आणि पुढचा तुमचा हितोपदेश मक्ख भिंत बनून ऐकत राहतो.उगाच मधले TRIVIALISATION त्याला अपराधी भावना देत.
यातला "काळजी करतोयस" हा भाग त्यालासुद्धा समजत असतो, पण ती कमी कशी करायची हे त्याला कळत नाही हि तर त्याची आणि तुमचीही अडचण असते.
#डिप्रेशनच्या रुग्णाला
१) "सकारात्मक विचार कर" हे सांगणे म्हणजे अर्धांगवायू झालेल्या रुग्णाला 'पाय उचल , एव्हरेस्टवर जा ' सांगण्यासारखे आहे. त्याला पाय उचलता येत नाही हाच तर त्याचा आजार आहे. डिप्रेशन हा इच्छाशक्तीचा परालाय्सीस आहे. तीच पांगळी झालेली असते, तर सकारात्मक विचार कसा करणार?
२) "मन STRONG कर हा गीतोपदेश म्हणजे " तू मनाने दुबळा आहेस हे सांगणे असते. वास्तविक घट्ट मन, दुबळे मन अस काही असत का हेच नक्की नाही. माणसाच्या आयुष्यात काही STRONG तर काही WEAK MOMENTS असतात . THAT'S ALL!!
३) 'मन स्त्रोंग कर' एवढ सांगून काही श्रीकृष्ण थांबत नाहीत. 'मी बघ,अमुक प्रोब्लेममध्ये कसा घट्ट राहिलो' वगैरे उदाहरणे देतात. आधीच रुग्णाचा आत्मविश्वास कमी झालेला असतो, त्यात' ह्याला हे जमते मला मात्र जमत नाही' या विचाराने आत्मविश्वास आणखी कमी होतो. रुग्ण आणखी कानकोंडा होतो.
४)" मानसिक आजार वगैरे काही नसते, सगळे मनाचे खेळ आहेत" हे वाक्य तर "इंडियन पिनल कोड" मध्ये गुन्हा या सदरात टाकावे या मताला मी आलोय. असल्या पिचकार्या मारणारे काका, हे शक्यतो रोज १०० जोर, ५०० बैठका मारणारे, वगैरे जहाल पंथातले असतात. यांना घरच्या लोकांनी, ताकद असल्यास, मानगुटीला धरून उचलून रस्त्यावर सोडावे. ताकद नसल्यास चहा पाजून, निट घरी जा सांगावे.
रुग्णाशी RAPPORT जोडण्याची खरी कळ हि संवादशैलीत आहे. त्याविषयी आणखी कधीतरी!!

No comments:
Post a Comment